नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधी अडचणीत; गृहमंत्रालयाने पाठविली नोटीस

0

नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नागरिकत्वाचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो आहे. भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरुन स्वामी यांनी राहुल गांधींविरोधात तक्रार केली होती.

राहुल गांधी यांनी ‘ब्लॅक ऑप्स लि.’या कंपनीच्या कागदपत्रांवर ब्रिटनचा नागरिक असल्याचे म्हटल्याचा आरोप आहे. भारतात दुहेरी नागरिकत्व बेकायदा असून या प्रकरणी केंद्राने राहुल यांचे नागरिकत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली होती. स्वामी यांनी गृहमंत्रालयाकडे तक्रारही दाखल केली होती. मंगळवारी गृहमंत्रालयाने या तक्रारीच्या आधारे राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर राहुल गांधी काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राहुल गांधी यांचे नागरिकत्व आणि शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा अमेठीतील एका अपक्ष उमेदवाराने काही दिवसांपूर्वीच उपस्थित केला होता. मात्र त्यानंतर निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवला. त्यामुळे राहुल गांधींचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र अद्यापही या प्रकरणात त्यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.