शिवराज्याभिषेक शक ३५० दिनदर्शिका ना महाजन यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा

जामनेर प्रतिनिधी l

शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचा पराक्रम महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राची दुर्दम्य आकांक्षा, महाराष्ट्राच्या शौर्याचे तेजस्वी प्रतिक आहेत. बलाढ्य मोगल सत्तेशी युक्ती आणि बुद्धीने लढत महाराजांनी अक्षरशः शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली. हा सगळा संघर्षपूर्ण कालखंड म्हणजे महाराजांच्या अद्भुत प्रतिभेचा, दिव्यत्वाचा, अफाट सामर्थ्याचा साक्षात्कार होय. सर्वसामान्य मावळ्यांच्या बळावर आणि विश्वासावर झालेली ही वाटचाल म्हणजे भावी पिढ्यांसाठी कोरल्या गेलेली प्रेरणागाथाच होय.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९६ म्हणजे ६ जून १६७४ या दिवशी महाराजांचा राज्याभिषेक झाला. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर साऱ्या देशाच्या दृष्टीने ही एक असाधारण गोष्ट होती, एक सुवर्णक्षण होता. या क्षणाने मराठी माणसाच्या आयुष्यात नवीन पहाट उगवली, सामान्य माणसांच्या शक्तीने मदांध सतेला आव्हान दिल्या जावू शकते हा विश्वास महाराष्ट्रीयांच्या मनात रुजवल्या गेला, अनेक शतकांचे दास्य निखळून पडले आणि महाराष्ट्र धर्माची पुनःस्थापना झाली. या क्षणाने महाराज छत्रपती झाले, शिवराज्यभिषेक शकाचा प्रारंभ झाला महाराजांच्या दिग्विजयाची आणि मराठा साम्राज्याची ख्याती सर्वत्र निनादू लागली. पारतंत्र्याच्या अंधकारातून स्वराज्याच्या प्रकाशाकडे महाराष्ट्राला आणि देशाला घेवून जाणाऱ्या ऐतिहासिक आणि तेजोमय शिवराज्याभिषेक सोहळ्याला २०२४ या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत अर्थात या वर्षी हा सोहळा ३५० वर्षांत पदार्पण करत आहे. म्हणजेच म्हणजेच सन २०२३ २०२४ या वर्षात शिवराज्याभिषेक शक ३५० हा येत आहे.

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी चालू वर्षात २ जून रोजी येत असून २०२४ मध्ये ही तिथी २० जून रोजी येत आहे. तेंव्हा दिनांक २ जून २०२३ पासून २० जून २०२४ या काळात शिवराज्यभिषेक महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या आयोजनाने महाराजांचे कृतज्ञ स्मरण करणे त्यांच्या असाधारण कर्तुत्वाचा जागर करणे, त्यातून निर्माण होणर्या उर्जेतून सत्कार्याची वाट उजळणे हा दैवी योग तर साध्य होईलच पण यासह नव्या पिढीपर्यंत महाराजांचा हा पराक्रमी वारसा पोहोचेल आणि त्यातून प्रेरणा घेत नवी पिढी सर्वच क्षेत्रात आपल्या प्रतिभेने अग्रेसर राहिल असा आम्हाला विश्वास वाटतो. शिवराज्यभिषेक महोत्सवाच्या अनुषंगाने आपल्याला तात्कालीन दिनदर्शिकेची ओळख होऊन त्याचा वापर आपल्याला आजच्या दैनंदिन व्यवहार, प्रशासकीय पत्रे, कामकाज करतांना व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जे.के.फाउंडेशन गोद्री ता.जामनेर यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील पहिली राज्याभिषेक शक ३५० या दिनदर्शिकेची निर्मिती केली असून रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या निवासस्थानी मा. ना.गिरीश महाजन (मंत्री, ग्रामविकास,पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य), सौ. साधनाताई महाजन (नगराध्यक्षा, नगरपालिका जामनेर), जे.के चव्हाण (सेवानिवृत्त उप अभियंता, जिल्हा परिषद जळगाव), सौ. रजनीताई चव्हाण (मा. बांधकाम महिला व बालकल्याण सभापती जळगाव), श्री. नानासाहेब आगळे (तहसीलदार जामनेर), श्री. श्रीकृष्ण इंगळे (गटविकास अधिकारी जामनेर) यांच्या हस्ते संपन्न झाले.