मुंबई: राज्य सरकार विशेषत: परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची महत्त्वकांक्षी शिवशाही बससेवा आहे. मात्र याबससेवेचा पुरता फज्जा उडाला आहे. दिवसेंदिवस त्रायदायक ठरत आहे. अपघातांचे वाढते प्रमाण तर आहेतच, मात्र चांगली सेवा देण्यातही शिवशाही कमी पडत आहे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी तसंच आरामदायी आणि गारेगार प्रवास व्हावा यासाठी शिवशाहीचं तिकीट काढलं, मात्र गाडीत बिघाड असल्याचं सांगत, महामंडळाने चक्क लाल डब्ब्याने प्रवास करण्यास सांगितले.
प्रणाली जाधव यांनी बोरिवली ते देवरुख (रत्नागिरी) या मार्गावरील प्रवासासाठी शिवशाही बसचं तिकीट बूक केले होते. प्रणाली आणि त्यांच्यासोबतच्या 9 जणांनी शिवशाहीचे अॅडव्हान्स तिकीट बुक केले. मात्र आज प्रवासाची वेळ आली त्यावेळी त्यांना भलताच अनुभव आला. आज सकाळी 7 वा बोरिवलीतील नॅन्सी कॉलनीवरुन सुटणारी शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे शिवशाहीऐवजी त्यांना एसटीत बसण्यास सांगण्यात आले.
मात्र इतके पैसे देऊन, अॅडव्हान्समध्ये तिकीट बूक करुन, लाल डब्ब्याने का जायचं, असा प्रश्न विचारत, प्रणाली जाधव यांनी लाल डब्ब्यातून जाण्यास नकार दिला. सध्या बोरिवली बस डेपोत ३० ते ३५ जण तिथेच थांबून आहेत. दुसरीकडे प्रवाशांना ज्या लाल डब्ब्याने प्रवास करण्यास महामंडळ सांगत आहे, त्या एसटीचा ड्रायव्हर नाईट शिफ्ट करुन आला आहे. त्यामुळे तो झोपण्यास गेल्याचं सांगण्यात येत आहे. म्हणजे एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार किती असावा, हे या सर्व प्रकारावरुन दिसून येते.