श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू

0

कोलंबो:श्रीलंकेची राजधानी कोलंबोत काल ईस्टर संडे साजरा होत असताना झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आज मध्यरात्रीपासून श्रीलंकेत राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याची घोषणा श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांनी केली आहे. श्रीलंकेत झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांत २९० पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. या हल्ल्याला स्थानिक इस्लामी अतिरेकी संघटना नॅशनल तौहीद जमात (एनटीजे) जबाबदार असल्याचे श्रीलंका सरकारचे प्रवक्ता राजीथा सेनारत्ने यांनी घोषित केले आहे.

रविवारच्या साखळी बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा २९०वर पोहोचला आहे. यात ४ जनता दल धर्मनिरपेक्ष (जेडीएस) पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ७ भारतीयांचा समावेश आहे. जेडीएसचे कार्यकर्ते एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी श्रीलंकेत गेले होते. स्फोट झाले तेव्हा ते एका हॉटेलात थांबलेले होते. मात्र, अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. श्रीलंकेचे पोलीस या दहशतवादी हल्ल्यातील धागेदोरे जुळवण्याच्या कामाला लागले आहेत. आतापर्यंत सुमारे २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. या दहशतवादी संघटनेला बाहेरील देशांमधूम मदत मिळाली आहे का, याचा तपास सुरू असल्याचे श्रीलंका सरकारचे मंत्री सेनारत्ने यांनी म्हटले आहे.