श्रीलंकेतील बॉम्बस्फोटानंतर भारतात हायअलर्ट जारी !

0

कोलंबो: जगभरात आज ईस्टर संडे साजरा होत असताना, श्रीलंकेची राजधानी कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. राजधानी कोलंबो शहरांमध्ये एकापाठोपाठ अनेक बॉम्बस्फोट झाले आहेत. तीन चर्च आणि तीन हॉटेलमध्ये लागोपाठ ८ स्फोट झाले आहेत. आतापर्यंत या स्फोटांमध्ये मृत्यूचा आकडा १६० च्यावर पोहचला आहे. मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर जखमींची संख्या ४००च्यावर पोहोचली आहे. दरम्यान श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर भारतातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीलंका भारताचा शेजारी राष्ट्र असल्याने भारतात देखील सुरक्षेच्या दृष्टीने अलर्ट जाहीर करण्यात आले आहे.

कोलंबो शहरातील चर्च आणि फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्यात आले. यामध्ये शेकडो निरापराध नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये विदेशी पर्यटकांचा समावेशही आहे. बट्टीकलोआ, कोच्छिकाडे आणि काटुवापिटिया येथील चर्चमध्ये स्फोट झाले आहेत. बट्टीकलोआ येथील चर्चमध्ये स्फोट झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, कोणत्याही दहशतवादी संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही.