भयावह परिस्थिती: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत विक्रमी वाढ

0

नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. भारतातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील रुग्णसंख्येने ४४ लाखांचा टप्पा पार केला असून ४५ लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे, देशात नव्याने ९५ हजार ७३५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वाधिक नोंद आहे. २४ तासांत ११७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ४४ लाख ६५ हजार ८६४ इतकी झाली आहे.

सध्या देशात ९ लाख १९ हजार १८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून ३४ लाख ७१ हजार ७८४ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आले आहे. करोनामुळे आतापर्यंत ७५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी २३ हजार ८१६ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १३ हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून २४ तासांत ३२५ करोनाबाधितांचा मृत्यू झाला. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आालेल्या ४८ लाख ८३ हजार नमुन्यांपैकी ९ लाख ६७ हजार ३४९ (१९.८१ टक्के) जण करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत, तर आतापर्यंत ६ लाख ८६ हजार ४६२ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्यांवर पोहोचले आहे. राज्यात १६ लाख ११ हजार २८० व्यक्ती घरगुती अलगीकरणामध्ये, तर ३७,६४४ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात सर्वाधिक ६५ हजार ३६१ करोनाबाधित पुणे जिल्ह्य़ात आहेत.