धुळे : राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे एसटी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा नाराजी झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी निर्णय जाहीर केला जाईल, असं परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर दोन दिवसातच निवडणूक आयोगाने राज्यातील लोकसभा आणि अन्य पोटनिवडणुकांसाठी 02 जून 2018 अखेर आदर्श आचारसंहिता जाहीर केली. ही आचारसंहिता राज्यातील 35 पैकी 28 जिल्ह्यांना लागू झाली. या काळात कोणत्याही प्रकारची घोषणा करता येत नाही.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना दिलेलं वचन पाळण्याची तीव्र इच्छा असूनही आचारसंहितेमुळे काही काळ थांबणं भाग पडलं असल्याचं एसटी प्रशासनाने म्हटलं आहे. असं असलं तरी एसटी प्रशासनाने तातडीने निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करुन प्रलंबित वेतनवाढ जाहीर करण्याबाबत विनंती केली आहे.