नवी दिल्लीः अयोध्यामधील रामजन्मभूमी-बाबरी वादाप्रकरणी आज बुधवारी सुप्रीम कोर्टात युक्तीवाद पूर्ण झाला आहे. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निकाल राखून ठेवला असून तो येत्या १७ नोव्हेंबरला याबद्दलची ऐतिहासिक फैसला सुनावण्यात येणार आहे. आज तासभर आधीच सुप्रीम कोर्टात या खटल्याची सुनावणी पूर्ण करण्यात आल्यानंतर १७ नोव्हेंबरला फैसला सुणावण्यात येणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टात बुधवारी राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणावर लागोपाठ ४० दिवस सुनावणी पूर्ण करण्यात आली. पाच सदस्यीय संविधानिक खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी पूर्ण केली.
आजच्या सुनावणीत मुस्लीम आणि हिंदू पक्षकाराने आपापली बाजू सुप्रीम कोर्टासमोर मांडली. आज सुनावणीदरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा सुद्धा पाहायला मिळाला. मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हिंदू महासभेच्या वकिलाकडून सादर करण्यात आलेला नकाशा सरन्यायाधीश यांच्यासमोर फाडून टाकला. वकिलाच्या या कृतीवर सरन्यायाधीस यांनी नाराजी व्यक्त केली. याआधी मंगळवारी झालेल्या सुनावणीत सर्व पक्षकारांना १६ ऑक्टोबर पर्यंत यासंबंधीचे पुरावे सादर करण्याचे निर्देश सरन्यायाधीश यांनी दिले होते. या प्रकरणावर फैसला सुनावण्यासाठी चार आठवड्याचा कालावधी लागणार असल्याने पक्षकारांनी बुधवारी आपापले पुरावे सादर करावे, असे सरन्यायाधीश यांनी आधीच नमूद केले होते.
मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वकिलाच्या युक्तीवादावर नाराजी व्यक्ती केली. जर याप्रकरणी असाच युक्तीवाद सुरू राहिल्यास आम्ही उठून जाऊ, असे त्यांनी म्हटले. मुख्य न्यायाधीशांच्या नाराजीनंतर हिंदू महासभेच्या वकिलाने दिलगिरी व्यक्त करीत मी कोर्टाचा सन्मान करतो. मी न्यायालयाच्या शिष्टाचाराचे उल्लंघन केले नाही, असे कोर्टात म्हटले. त्यानंतर ऑक्सफोर्डमधील एका पुस्तकाचा संदर्भ दिला. यावर आक्षेप घेत मुस्लीम पक्षकाराचे वकील राजीव धवन यांनी हा नकाशा फाडून टाकला. वकिलाच्या या कृतीवर मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.