सकाळी एकासोबत शपथ,संध्याकाळी दुसरा सोबतीला

कलगीतुरा : अजित पवारांनी शिंदे गटातील आमदारांवर केलेल्या भविष्यवाणीला मंत्री गुलाबराव पाटलांचा टोला

जळगाव |प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. त्यातच अलिकडे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांची भविष्यवाणी केली आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडलेला एकही नेता पुन्हा निवडून येणार नाही, अशी टीका केल्यामुळे शिंदे गटातील काही आमदारांची धडधड वाढली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी कुणाबरोबर तरी शपथ घ्यायची आणि संध्याकाळी कुणाबरोबर जायचं, अशांनी आम्हाला सल्ला देण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवारांच्या टीकेबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, शेवटी जनता हुशार आहे. अजित पवारांनी जे वक्तव्य केलं आहे, ते कितपत लागू होतं, हे त्यांनीच तपासून बघावं. हे सकाळी कुणाबरोबर शपथ घेतात आणि संध्याकाळी कुणाबरोबर जातात. तिसर्‍या दिवशी कुणाबरोबर सरकारमध्ये बसतात. अशांनी आम्हाला या गोष्टी सांगण्याची गरज नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी लगावला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले?
जे आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून बाहेर पडले आहेत. त्यातील एकही आमदार निवडून येत नाही. नारायण राणेंनी शिवसेना फोडली होती. सगळे बाहेर पडले. त्यानंतर राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. मुंबईत तर त्यांना एका महिलेने पाडलं, अशी खोचक टोलेबाजी अजित पवारांनी केली होती.