मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ ला लागला असून, सत्ता स्थापनेसाठी सेना, भाजपामध्ये रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेकडून अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पदावर दावा ठोकला जात आहे, तर दुसरीकडे भाजपाकडून मुख्यमंत्री पदावर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस राहतील अशी घोषणा करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पन्नास पन्नास टक्के फॉर्म्युलावर एकमत झाल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान आपण असं कोणतेही आश्वासन शिवसेनेला दिले नसून पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केलं. यादरम्यान देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसंच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका भाजपाच्या नेत्याने दिली आहे. तसंच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. ५०-५० चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेला नाही. एवढंच नाही तर पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मंगळवारी म्हटलं होतं. भाजपाच्या नेतृत्त्वातच सरकार स्थापन होईल. अगदीच आडमुठी घेणार नाही. तसंच काही मागण्या मेरिटवर तपासून पाहू असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि भाजपादरम्यान सत्तास्थापनेवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली बैठक रद्द केली होती.