नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच: राहुल गांधी

0

नवी दिल्ली: मोदी सरकारने तीन वर्षापूर्वी चलनातील पाचशे आणि एक हजार रुपयाच्या नोटा बाद करण्याचा निर्णय घेतला होता. याला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहे. यावरून आज विरोधकांनी आजचा दिवस काळा दिवस होता असे आरोप केले आहे. दरम्यान कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता अशा शब्दात भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा निर्णय घेऊन १ हजार आणि ५०० च्या चलनी नोटा बंद केल्या. या निर्णयाला तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे ट्विट केले आहे. नोटबंदीचा निर्णय हा दहशतवादी हल्लाच होता. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली, तर अनेकांना त्यांचा जीव गमावावा लागला असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोटबंदीच्या निर्णयामुळे अनेकांना जीव गमवावा लागला. अनेक लहानसहान उद्योग ठप्प झाले आहेत. या निर्णयामुळे लाखो नागरिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असेही राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या क्रूर हल्ल्यामागे ज्या कोणी व्यक्ती असतील त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी अशीही मागणी राहुल गांधी यांनी केली.