पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली  

शरद पवारांनी दिली अप्रत्यक्ष कबुली

मुंबई | प्रतिनिधी

पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. एक प्रकारे शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल माहिती असल्याचे कबुल केले आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शरद पवारांना माहिती आहे असे वक्तव्य केले होते.

पवार म्हणाले की, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर बोलण्याची काय गरज आहे. समजेन वाले को इशारा काफी है, म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आपल्याला पहाटेच्या शपथविधीबाबत माहिती असल्याचे मान्य केल आहे. पहाटेचा शपथविधी ही राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठीची खेळी होती,  हेच या वक्तव्यातून स्पष्ट झाले आहे.  शरद पवारांनी याआधी म्हटले होते की, मला वाटले देवेंद्र हा सुसंस्कृत, सभ्य माणूस आहे. असत्याचा आधार घेऊन ते असे स्टेटमेंट करतील, असे मला कधी वाटले नव्हते. यानंतर त्यांनी आज अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

फडणवीस काय म्हणाले होते
महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल लागल्यानंतर शिवसेनेने भाजपशी फारकत घेत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्याच वेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सर्वांना धक्का देत 23 नोव्हेंबर 2019 रोजी पहाटे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र शरद पवारांनी लगेच सूत्रे हलवल्यामुळे हे सरकार 72 तासांत कोसळले. पण शपथविधीचा चमत्कार कसा घडला हे अजूनही गुलदस्त्यात आहे. तब्बल 3 वर्षे 2 महिन्यांनी फडणवीस यांनी याबाबत गौप्यस्फोट केला. ते अजित पवारांचे बंड नव्हते, तर शरद पवारांशी चर्चा करूनच सारे ठरले होते. पण नंतर या गोष्टी बदलल्या,असे फडणवीस म्हणाले. शरद पवारांनी मात्र त्याचे खंडन केले. देवेंद्र यांनी 3 वर्षांनंतर हा गौप्यस्फोट का केला याची आता चर्चा होत आहे.