पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुणे शहरातील चांदणी चौक येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतीम टप्प्यात आहे.
पुणे शहरातील चांदणी चौक येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने…
— Supriya Sule (@supriya_sule) May 10, 2023
हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे. मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी १९२१ साली शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला.या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे खासदार सुळे यांनी म्हटले आहे.