पटना: बिहारमध्ये संयुक्त सरकारात असलेले भाजप आणि जेडीयू यांच्यात लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात भाजप आणि जेडीयूत फुट पडली आहे. जेडीयूला एकही मंत्रीपद न दिल्याने बिहार सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात येणार नाही.
बिहारमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार होणार असून जेडीयूच्या कोट्यातून सात जण मंत्री शपथ घेणार आहेत. जेडीयूच्याच मंत्र्यांना शपथ देण्याबाबत केंद्र सरकारवरील नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपालांना भेटून विस्ताराबाबत कळविले आहे. राजभवनात सकाळी 11.30 वाजता हा शपथविधी होईल. यामध्ये अशोक चौधरी, नीरज कुमार, लक्ष्मेश्वर राय, श्याम रजक, बीमा भारती, संजय झा, नरेंद्र नारायण यादव यांचा समावेश आहे. या विस्ताराद्वारे नितीशकुमार दलित आणि मागासलेल्या मतदारांमध्ये आपली पकड अधिक मजबूत करण्याची खेळी खेळू शकतात. राज्यात 50 टक्क्यांपेक्षा अधिक मागासलेल्या समाजांची मते आहेत. पुढील वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे पक्ष याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच प्रलंबित असलेले प्रकल्पही जलदगतीने पूर्ण करणार आहे.
विधानसभा निवडणुका दीड वर्षावर आल्याने सर्वच पक्षांनी तयारी केली आहे. गेल्या निवडणुकीत जदयू आणि लालू प्रसाद यादवाच्या पक्षाने हात मिळवत भाजपाला सत्तेपासून दूर सारले होते. मात्र, त्यांच्यात बेबनाव झाल्याने नितीशकुमारांनी भाजपाशी संधान साधत मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राखली होती. याचा बदला लालूंचा पक्ष राजदने भाजपाच्या नेत्यांनाच इफ्तार पार्टीचे निमंत्रण दिले आहे. राबडीदेवी यांच्या घरी ही पार्टी आयोजित केली असून भाजपासोबत असलेले अंतर कमी करण्याचा प्रयत्न सुरु असून काँगेस पुन्हा नितीशकुमारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.