भुवनेश्वर – 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मोदींचा हा निर्णय भाजपसाठी फायदेशीर ठरला. आता मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पूर्व भारतात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी ओडिशामधील जगन्नाथ (पुरी) येथून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे. शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मोदींनी पुरी येथून निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ओदिशातील भाजपाच्या समितीने दिला आहे.
पंतप्रधान मोदींनी ओदिशातील भाजपाच्या कार्यकारिणीने दिलेला प्रस्ताव स्वीकारल्यास ते ओडिशामधून निवडणूक लढवणारे नरसिंहा राव यांच्यानंतरचे दुसरे पंतप्रधान ठरतील. याआधी 1996 साली नरसिंहा राव यांनी बरहामपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच त्या निवडणूकीत त्यांनी तब्बल 62.5 टक्के मते मिळवून बाजी मारली होती.
2019 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपाने पूर्व भारतावर लक्ष केंद्रित आहे. मोदी यांनी पुरी येथून निवडणूक लढवल्यास कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, असा दावा भाजपाचे ओदिशा अध्यक्ष वसंत पांडा यांनी केला आहे.
ओडिशामध्ये सध्या दीर्घकाळापासून सत्तेवर असलेल्या बीजेडीविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा फायदा उठवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने ओदिशातील २१ पैकी १, पश्चिम बंगालमधील ४२ पैकी २, तेलंगाणामधील १७ पैकी १ आणि आंध्र प्रदेशमधील २५ पैकी २ जागांवर विजय मिळवला होता. आता या राज्यांमधून अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे.