गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

0

मुंबई- गाणकोकीळ, गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज ८९ वा वाढदिवस आहे. त्यांचा मधुर आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. त्यांच्या आवाजाने देशाला वेड लावले आहे. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येऊन त्यांच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडीलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे शिक्षण घेण्यास सुरूवात केली. त्या अनेक वर्षे रंगभूमीवरही कार्यरत होत्या. १९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यानंतर १९४५ मध्ये दीदी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत मुंबईत आल्या. त्यांनी उस्ताद अमानत अली खान यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. त्यानंतर १९४६ मध्ये ‘आपकी सेवा में’ या सिनेमात ‘पा लागूं कर जोरी’ हे गाणे गायले.

त्यानंतर संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी ‘मजबूर’ या सिनेमातील ‘दिल मेरा तोडा, कहीं का ना छोडा’ हे गाणे गायला सांगितले. हे गाणे बऱ्यापैकी लोकप्रिय झाले. दीदींनी एका मुलाखतीत गुलाम हैदर यांना आपले ‘गॉडफादर’ असल्याचे म्हटले होते. विशेष म्हणजे दीदींनी ‘पहिली मंगळागौर’ या चित्रपटातही काम केलं होता.

आजपर्यंतच्या कारकीर्दीत लतादीदींनी ७ दशकांमध्ये १००० हून अधिक हिंदी चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. तर ३६ हून अधिक भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. २००१ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. याशिवाय, १९६९ मध्ये ‘पद्मभूषण’, १९८९ मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ आणि १९९९ मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले होते.