उद्या राज्यातील १७ मतदारसंघात मतदान !

0

मुंबई: महाराष्ट्रातील मतदानाच्या अखेरच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी उद्या सोमवारी 29 एप्रिल रोजी 17 मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे. 3 कोटी 11 लाख 92 हजार 823 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1 कोटी 66 लाख 31 हजार पुरुष तर 1 कोटी 45 लाख 59 हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक 332 तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण-, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मावळ, शिरुर या मतदारसंघात मतदान होत आहे.

या लोकसभा मतदारसंघांमध्ये 102 विधानसभा मतदारसंघ असून 33 हजार 314 मतदान केंद्र आहेत. सुमारे 1 लाख 7 हजार 995 ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर 43 हजार 309 व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये 31 मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. ‘सखी’ मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.