नवी दिल्ली: मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकच्या पद्धतीवर बंदी घालणारे तिहेरी तलायक विधेयक आज शुक्रवारी लोकसभेत सादर करण्यात आले आहे. कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक लोकसभेत मांडले. विशेष म्हणजे तिसऱ्यांदा लोकसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. रवीशंकर प्रसाद यांनी विधेयक मांडताच लोकसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला.
काँग्रेस नेते शशी थरुर आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी विधेयकाला विरोध केला असून आक्षेप नोंदवला आहे. विधेयकातील अनेक तरतुदी संविधानाच्या विरोधी असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे. दरम्यान लोकसभेचं न्यायालय करु नका असं आवाहन रवीशंकर प्रसाद यांनी विरोधकांना केलं.
सोळावी लोकसभा गेल्या महिन्यात विसर्जित झाली असून तिहेरी तलाकचे विधेयक हे संसदेत मंजूर झालेले नाही, ते राज्यसभेत पडून आहे. लोकसभा विसर्जित होत असताना जी विधेयके राज्यसभेत दाखल असतात ती बाद होत नाहीत, पण जी विधेयके लोकसभेत संमत होऊन राज्यसभेत पडून आहेत ती मात्र बाद होतात. तलाक विधेयकाला विरोधी पक्षांनी राज्यसभेत कसून विरोध केला आहे व तेथे सरकारचे संख्याबळ अपुरे आहे, त्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही.