बंगळूर-कर्नाटकात भाजपाच्या सत्तास्थापनेनंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी घोडेबाजार तेजीत येण्याची शक्यता असून भाजपाने सत्तास्थापन करताच काँग्रेसचे दोन आमदार गायब झाले आहेत. यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून ते दोन्ही आमदार पक्षासोबतच आहेत, असा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र, ते दोन आमदार नेमके कुठे आहेत, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे. मस्कीमधून निवडून आलेले आमदार प्रताप गौडा पाटील आणि बेल्लारीचे आमदार आनंद सिंह हे दोन्ही आमदार गायब झाले आहेत.
कर्नाटकात गुरुवारी भाजपा नेते येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, भाजपाकडे १०४ जागा असून त्यांना ११२ हा निर्णायक संख्याबळाचा आकडा गाठण्यास आणखी आठ आमदारांची गरज आहे. यामुळे कर्नाटकात घोडेबाजार तेजीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपाकडून आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, हे लक्षात घेऊन काँग्रेसने आपल्या आमदारांना ईगलटोन या रिसोर्टवर नेले होते. मात्र, काँग्रेसचे दोन आमदार गायब झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ झाली.