वरणगांव नजिक ट्रकची दुचाकीला धडक दोन युवक ठार

( शिरसाळे मारोतीच्या दर्शनासाठी जात असलेल्या युवकांवर क्रुर काळाचा घाला, दोन जण सुखरूप बचावले )

प्रतिनिधी : वरणगांव

शिरसाळे येथील मारोती रायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या युवकाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दोन युवक ठार झाल्याची घटना शनिवारी पहाटे महामार्गावरील बोहर्डी गावाजवळ घडली. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन युवक थोडक्यात बचावले. चौघेही मित्र सावदा येथील रहीवाशी आहेत .

सावदा येथील भास्कर पांडुरंग कुंभार , लखन पंकज कुंभार, भुषण चंद्रकांत कुंभार व भुषण किशोर पुर्भी ( सर्वांचे वय – १८ ते १९ ) हे चार शालेय मित्र गेल्या चार शनिवार प्रमाणे शिरसाळे मारोती ( ता.बोदवड ) येथे दोन दुचाकीद्वारे हतनुर धरण मार्गे दि .२५ रोजी सुद्धा सकाळी दर्शनासाठी निघाले होते. मात्र, मुक्ताईनगरकडे जात असतांना महामार्गावरील बोहर्डी गावाच्या अवघ्या काही अंतरावर मागील बाजूने भरवेगात येणाऱ्या अज्ञात ट्रकने भास्कर कुंभार याच्या दुचाकी क्रं. एम.एच. १९ / ८७८९ धडक दिली. यामुळे झालेल्या आवाजाने पुढील दुचाकीवर जात असलेल्या भुषण पुर्भी यांनी आपली दुचाकी माघारी फिरवुन आपल्या अपघातग्रस्त मित्रांजवळ धाव घेऊन आक्रोश सुरु केला.याची माहीती मिळताच बोहर्डी गावातील रविंद्र पाटील व निलेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जख्मींना रिक्षा व दुचाकीद्वारे वरणगांव ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र, डॉ . क्षितीजा हेंडवे यांनी भास्कर कुंभार याला मयत घोषीत करून गंभीर जख्मी लखन कुंभार याचेवर प्राथमिक उपचार करून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केले. मात्र, त्याचाही भुसावळातील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला . तर या घटनेची माहिती मिळताच वरणगांव पोलीस ठाण्याचे एपीआय आशिषकुमार आडसुळ व पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनीही सकाळी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती .
*दोघे मित्र थोडक्यात बचावले*
आपल्या मागील मित्राच्या दुचाकीच्या अपघाताचा आवाज येताच पुढे जाणाऱ्या भुषण पुर्भी व भुषण चंद्रकांत कुंभार या मित्रांनी त्यांच्याकडे जाण्यासाठी आपली दुचाकी माघारी फिरवली असता ट्रक चालकाने त्यांनाही कट मारण्याचा प्रयत्न केला . मात्र, ते थोडक्यात बचावले यावेळी चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून भरवेगात पोबारा केला. चारही मित्र शालेय विद्यार्थी असून ते सावदा येथील डि. एन . महाविद्यालयात बीए च्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होते. तर अपघातातील मयत भास्कर कुंभार हा हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे गावातीलच चहाच्या दुकानावर काम करून शिक्षण करीत होता. त्याने देव दर्शनासाठी मालकाची दुचाकी घेतली होती . मात्र, क्रुर काळाने दोन्ही मित्रांवर झडप घालून त्यांना कुटुंबापासून हिरावुन नेल्याने या घटनेची माहीती सावदा येथे कळताच अनेकांनी वरणगांव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. तर घटनेमुळे सावद्याच्या चांदणी चौकात शोककळा पसरली असून मयत भास्कर कुंभार व लखन कुंभार यांचेवर दुपारनंतर सावदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले . या घटनेबाबत भुषण पुर्भी याने दिलेल्या फिर्यादीवरून वरणगांव पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला .