मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या सल्ल्यावर आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतू बाहेर पडावं, हा प्रकाश आंबेडकरांचा चांगला सल्ला आहे. प्रकाश आंबेडकर यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोस्ती होती. ही दोस्ती आता आहे की नाही ते माहिती नाही.
प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ला उद्धव ठाकरे यांनी मान्य करायला हरकत नाही. परंतु उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकतात की शरद पवारांचा ते लवकरच कळेल. मात्र प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला योग्य आहे, या सल्ल्याला माझाही पाठिंबा आहे, असं रामदास आठवले म्हणाले.