जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आज महत्वाचा निर्णय घेतला. अतिवृष्टी तसेच ओला दुष्काळ लक्षात घेत विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालये, परिसंस्थामधील आणि विद्यापीठ प्रशाळांमधील सरसकट सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. याचा अंदाजे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. अभाविप, युवा सेना, दर्जी फाऊंडेशन, विद्यापीठ विकास मंच या संघटनांकडून अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या बैठकीत या संघटनांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा झाली. अशा परिस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका दिलीप पाटील यांनी मांडली. प्राचार्य एल.पी. देशमुख, दीपक पाटील, प्रा. नितीन बारी व इतर सदस्यांनी याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.
चर्चेअंती परिक्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांचे मार्च, एप्रिल, मे, २०२० मध्ये होणाऱ्या परीक्षांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अंदाजे १ लाख ७५ हजार एवढी आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने परीक्षांच्या कामाचे मानधन प्राध्यापकांनी घेऊ नये, असे आवाहन प्राध्यापकांच्या दोन्ही संघटनांना व्यवस्थापन परिषद सदस्यांच्यावतीने करण्याचेही ह्या बैठकीत ठरले.