नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतांना ‘चौकीदार चोर है’ या घोषणेचा प्रयोग केला होता. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. कोर्टाने राहुल गांधींचे विधान चुकीचे असल्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र कोर्टाने माफी मागण्याचे सांगितल्यानंतर राहुल गांधी यांनी आज ८ रोजी कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे आता या वादावर पडदा पडला आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान, काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राफेलप्रकरणी यापूर्वी केंद्र सरकारला फटकारले होते. मात्र, कोर्टाच्या या निकालाचा दाखला देताना राहुल गांधी यांनी कोर्टानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपाने आक्षेप घेतला होता. तसेच राहुल यांच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत केवळ खेद व्यक्त केला होता. मात्र, आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्यावतीने बिनिशर्त माफी मागितली.
दरम्यान, राफेलप्रकरणी शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. तत्पूर्वी घडलेली ही घडामोड महत्वाची मानली जात आहे.