नवी दिल्ली-उन्नावमधील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगरची पीडितेच्या मागणीनुसार उन्नाव तुरूंगातून सीतापूरच्या तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. आरोपी सेंगर याला उन्नाव जेलमधून हलवावं यासाठी पीडितेने उच्च न्यायालयात मागणी केली होती. याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी अजून झालेली नाही, मात्र त्यापूर्वीच प्रशासनाने सेंगरला सीतापूर तुरूंगात हलवलं आहे.
मंगळवारी सकाळीच कुलदीप सेंगरला उन्नाव जेलमधून कडक सुरक्षा व्यवस्थेत सीतापूर तुरूंगात हलवण्यात आलं. सेंगरला उन्नावमधून दिल्लीतील तुरूंगात हलवावं अशी मागणी पीडितेने केली होती. आरोपी सेंगर उन्नावमध्ये राहिल्यास माझ्या जीवाला आणि माझ्या कुटुंबियांच्या जीवाला धोका असल्याची शंका पीडितेने व्यक्त केली होती. उन्नाव तुरूंगातील काही अधिकारी सेंगरचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकत नाही, असं पीडितेने म्हटले आहे.
यापूर्वी, सात दिवसांच्या सीबीआय कोठडीनंतर सेंगरला उन्नाव तुरूंगात ठेवण्यात आलं होतं. हा संपूर्ण खटला दिल्लीमध्ये ट्रान्सफर करावा, कारण उन्नावमध्ये असल्याने आरोपी सेंगर साक्षीदारांना धमकावू शकतो, तो तेथे असेपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही अशी मागणी पीडितेने केली होती.