अयोध्येतील श्रीरामलल्लांच्या दर्शनाने, भाग्य उजळले – जन्म सार्थकी लागला…!
जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांची कृतार्थ भावना
जळगाव (प्रतिनिधी) : २२ जानेवारी रोजी श्रीक्षेत्र अयोध्या नगरीत प्रभू श्री रामलल्लांचा मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा म्हणजे या शतकातला सर्वोत्तम, महन्मंगलम असा सोहळा होता. हा सोहळा बघण्यासाठी असमंतांत देवादेकांनी देखील गर्दी केली असावी इतका तो न भूतो न भविष्यती असा झाला. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळाले. माझा जन्म सार्थकी लागला असे भावपूर्ण उद्गार जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी काढले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याहून परत आल्यावर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे आत्मिक तेज लकाकत होते. यासंदर्भात बोलतांना त्यांनी जैन परिवाराच्या गौरवशाली परंपरेचा दाखला दिला. महाराष्ट्रातील ही आमची बत्तीसावी पिढी. आमचा ८८० वर्षांचा इतिहास उपलब्ध असून महाराष्ट्रात येवून १२८ वर्ष झाली. आमच्या घर-घराण्याला धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याची परंपरा आहे. आमचे जे पूर्वज आमच्या सोबत नाहीत त्या सर्वांचा तसेच आमच्या आई-वडिलांचा दिव्य आशिष आम्हाला लाभला असून थोरामोठ्यांचे आशीर्वाद ही पाठीशी आहेत. जळगाव जिल्हा वासियांचा-आपणासर्वांचा सदिच्छेमुळे मला अयोध्या येथील प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. १४० कोटींच्या वर लोकसंख्या असेलेल्या या महान भारत वर्षातून तसेच जळगाव जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांच्या वतीने अयोध्या येथील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले, असे ते म्हणाले.
आपल्या पिताश्रींच्या संस्कारांनी हा योग चालून आला हे सांगतांना ते भारावून गेले होते.. आयुष्याच्या या वाटचालीत अयोध्या येथे प्रभू श्री रामलल्लाचे आगमन, प्राण प्रतिष्ठा तसेच मंदिर निर्माणानिमित्त अयोध्या येथे जाण्याचं मला सौभाग्य प्राप्त झालं, ही माझ्या आयुष्यातील सर्वांग सुंदर अनुभूती आहे! माझ्या वडिलांच्या शब्दात सांगायचे तर Leave this word better than you found it – सार्थक करूया जन्माचे, रुप पालटू वसुंधरेचे!- आयुष्याच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक क्षेत्रात माझ्या वडिलांचे हे ब्रीद वाक्य सत्यात उतरवण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. या घटनेमुळे तर मी निश्चितच सविनय मात्र अभिमानाने सांगू इच्छितो की, माझ्या वडिलांच्या या ब्रीद वाक्याचा अर्थ पूर्णपणे सार्थक झाला आहे, हे त्यांनी नमूद केले.
निमंत्रण देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री योगेश्वर गर्गे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवह स्वानंद झारे, विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री ललित चौधरी आणि जिल्हा कार्यवाह हितेश पवार यांनी दि. १६ जानेवारी २०२४ रोजी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या यांच्यावतीने मला आमंत्रण दिले. ही साक्षात श्रीरामांचीच कृपादृष्टी असल्याचे ते म्हणाले. श्री दि. २२ तारखेला लाभलेली अनुभूती म्हणजे सनातन धर्मात जगातील सर्वात मोठा सनातन धर्माचा उत्सव संपन्न झाल्याचे अशोकभाऊंनी पटवून दिले.
पुढे बोलतांना अशोकभाऊंनी पर्यटनाची बाजू विशद केली. व्हॅटीकनसिटी येथे ख्रिश्चन धर्मीय एक करोडच्यावर दरवर्षी भेट देत असतात. मक्का मदीना येथे दोन ते तीन कोटीच्या दरम्यान मुस्लीम भेट देत असतात. गोल्डन टेम्पल येथे तीने ते साडेतीन करोड, तिरुपती येथे तीन ते चार करोड भेट देतात. अयोध्या येथे मात्र दरवर्षी पाच करोड भाविक भेट देतील हे नक्की! जगातील सर्वात मोठं धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळ अयोध्या हेच असणार आहे याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
भाग्यवंत म्हणो तया
नेत्री पाहिले रामराया ।
प्राणप्रतिष्ठा सोहळा
याची डोळा पाहिला ।
पूर्वसूकृत कामी आले
अयोध्येसी जाणे झाले।
या ऐतिहासिक सोहळ्यात कान्हदेश आणि अयोध्या यांचा सुंदर मेळ बघायला मिळाला हे सांगत त्यांनी, अयोध्या नगरीच्या आंतरराष्ट्रीय विमान तळाला वाल्मिक ऋषीचे नावं देण्यात आल्याचे नमूद केले. हनुमानाची मूर्ती तर प्रत्येक ठिकाणी रामा सोबत आहे. जटायूचीही मूर्ती राम मंदिरात बसविण्यात आली आहे. मंदिरातील भोजन कक्षाला शबरीच नावं देण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यां तळोद्याच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. ब्रिटिश सत्ता स्थापन होण्या आधी खान्देश होळकर राज्याचा भाग होता. त्या खान्देश राणीची अहिल्यादेवींचीही मूर्तीही राम मंदिरात बसविण्यात येणार आहे. हा सुखद संयोग असल्याचे त्यांनी दाखवून दिले. थाळनेरच्या लता मंगेशकर यांचं नावं एका मुख्य चौकाला देण्यात आले आहे. सरदार पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. याच्या पेक्षा उंच रामाचा पुतळा आयोध्येत बसाविण्याची योजना आहे. हां पुतळा गोंदूर धुळे येथील राम सुतार तयार करणार आहेत. सोनगीर हे तांबे पितळीच्या भांडयासाठी प्रसिद्धी आहे. या तांबट कासाराणी 200 ताब्याचे नक्षीदार कळस तयार करून आयोध्येलां पाठविले आहेत. या कळसानें रामलल्लावर प्राण प्रतिष्ठाच्या वेळी जलाभीषक केला गेला. आयोध्येत कान्हदेशचा झालेला हा सन्मान प्रत्येक कान्हदेशवासीयांची मान अभिमानाने उंचावणारा असल्याचा अशोकभाऊ जैन यांनी गौरव केला.
भविष्यात अयोध्या ही वैश्विकस्तरावर अध्यात्मिक राजधानी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निमित्ताने पर्यटन, उद्योग आणि हजारो लोकांना रोजगार असा त्रिवेणी विकास साधला जाणार असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीचे मनःपूर्वक स्वागत केले.